जालना:-मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आजपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून सगे-सोयरेयांचा अध्यादेश कायद्यात रूपांतर करावा अशी मुख्य मागणी केली जात आहे. सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. या उपोषणादरम्यान पाणी पिणार नाहीत किंवा डॉक्टरांकडून उपचार घेणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय. सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबात सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसत आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. येत्या 15 फेब्रुवारीपासून आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मात्र त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. यासोबत मनोज जरांगे पाटील यांनी नऊ मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत.
